Thursday, February 12, 2009

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर
ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


************ ********* *********

तिचे बोलणे ऐकून तो जरा... अस्वस्थ झाला. त्याच्या चेहे-यावरचा तो भाव तिला काही निराळाच भासला. क्शणातच त्याचा राग गायब झाला होता. त्याच्या डोळ्यातच तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले... हसून त्याने तिला विचारले.....आता तुझी पाळी....

तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर....
आता तू सांग कशी जगशील??
हाताच्या रेषांमध्ये कोणाचे नाव शोधशील?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील?
खिडकीत लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील?
कोणाला आपल्या गप्पांमध्ये गुंतवशील?

एकाकीपण जेव्हा खायला येईल,
निरभ्र आभाळ जेव्हा अचानक भरून येईल,
गड्गडाटाने जेव्हा सौदमिनी गरजेल....
तेव्हा सांग कोणाला बिलगशील??

गप्पांचा ओघ ओसरू लागताच..
तू नकळत काही बोलून जाताच...
सांग स्वत:ला कशी आवरशील?
जखमी मनाला कशी सावरशील?

चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रू पाघळशील...
एकटीच स्फ़ुंदत बसशील..
किती वेळ तरी....

मैत्रिणींना एका "मैत्रिणीची" गोष्ट सांगताना.......
तू हळवी होशील...रडशील.
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील.

माझी जाणीव हवा तुला करून देईल,
माझा भास छाया तुला करून देईल,
पाहशील जेव्हा झोपाळा एकाकी झुलताना,
माझा आभास श्वास तुला करून देईल,

लक्श कुठेही लागणार नाही,
चंचल चित्त स्थिरावणार नाही
स्वत:चे अश्रू कसोशीने तू दडशील,
मनात मला लपवून "नोर्मल" जगशील,
तुझ्या मनाचा रिक्तपणा कोणालाही कळणार नाही,
तू असेच दिवस रेटत जाशील...
सांग काय करशील?

तिच्या गोंधळलेल्या चेहे-यावर कोरलेले उत्तर त्याला उमजले..........
आणि त्यांचे ते भांड्ण...... असेच विरून गेले!!!

-अनामिक

1 comment: