Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts
Showing posts with label कुसुमाग्रज. Show all posts

Thursday, March 1, 2012

सहानुभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी
प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी
कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग
भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला
जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास
नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?
कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला
तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर
म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी
खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट
आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात
- कुसुमाग्रज

Tuesday, November 15, 2011

अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !
कधी लवचिक पाते खड्गाचें लवलवते,कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.
मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.
चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.
वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.
चालला पुढे तो लचकत मुरडत मान,अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !
हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,रे नकूल आला ! आला देख, नकूल !
थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.
पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !
रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !
क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।
संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,पिंजून कापसापरी पडे तो नाग,ते खंड गिळाया जमले कीटक भोती !
- कुसुमाग्रज