Friday, July 17, 2009

मी नाही अभ्यास केला !!

दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले चार
आई नी दिला मार
मार खाण्यात
एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले पाच
दादाने फोडली काच
काच वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले नऊ
बाबांनी आणला खाऊ
खाऊ खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला


रात्रीचे वाजले दहा
झोप आली पहा
डुलक्या घेण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले बारा
आकाशात दिसला तारा
तारा पाहण्यात एक तास गेला
बघा मी अभ्यास केला!

-अनामिक

Wednesday, June 24, 2009

चंद्र आणखी प्रिती यांचे काय

चंद्र पाहता सय प्रितीची तरुण मना का येते ?
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग कलावती तू, तुला असावी अचूक तयाची जाण ग
अन्‌ प्रीतनगरचा राजा मन्मथ, चंद्र तयाचा प्रधान ग !
अग प्रीत नगरची प्रजा तयाच्या मुजऱ्यासाठी येते
अन्‌ प्रधान साक्षी ठेवून राणी आण प्रितीची घेते

तोंडावरती जडे काळीमा, झिजते ज्याची कला कला
तो मदनाचा मंत्री कैसा समजून सांगा तुम्ही मला ?
गुरुपत्नीशी पाप करी हा, शाप बाधला याते
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग चंद्र उगवता समुद्र उसळे चढती डोंगर लाटा
अन्‌ तो देखावा प्रीतरसाचा शाहीर म्हणती मोठा
अग नभ धरणीचे अंतर त्यांच्या प्रीतिने तुटते
अन्‌ चंद्र आणखी प्रिती यांचे तूच ठरव गे नाते !

लाटा उठती सागरात ज्या, त्या तर त्याच्या लेकी
चंद्र-लहरींची प्रीत जोडिती त्यांची फिरली डोकी !
सखी बहिण अन्‌ सख्या भावाची प्रीत कधी का होते ?
चंद्र आणखी प्रिती यांचे काय असावे नाते ?

अग चंद्र कसा ग होईल भाऊ उगाच सागर लाटांचा ?
अन्‌ आधारासी दाव पुरावा नको धिटावा ओठांचा !

देव-दानवी समुद्र मंथन पुराणांतरी केले ना !
मंथनात त्या रत्न चंद्रमा उसळून वरती आले ना !
जन्म पावला सागर पोटी तो तर त्याचा बेटा
त्याच सागरी जन्मतात ना निळ्या उसळत्या लाटा !

अहो बहिण-भाऊ याहुन कुठले चंद्र-लहरिंचे नाते ?
चंद्र पाहता सय प्रितीची तरूण मना का येते ?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले, विठ्ठल शिंदे
चित्रपट - सांगते ऐका (1959)

Sunday, May 24, 2009

मी तिच्याशी अबोला धरतो तेव्हा...


निळ्या निळ्या आभाळात एक मेघ झरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
आता येईल फोन तिचा ’बोलत का नाहीस?
एसेमेसला माझ्या उत्तर पाठवत का नाहीस?
तुझं गाणं तुझे शब्द वेडं करतात मला!
झालं गेलं विसर आणि सोड ना अबोला!’
काळजाचा डोह माझ्या आठवणींनी भरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
तिचं हसणं तिचं बोलणं आणि तिची बडबड
तिचं मौन सोसणं मला जातं खूप अवघड
मीही तिच्यात गुंतलो होतो आता कळ्तं मला
तिचं नसणं कण कण जाळत असतं मला
तिलासुध्दा तिथे आता हाच विचार स्मरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
अन एकाएकी लागेल उचकी येईल तिचा फोन
मी सुध्दा हॅलो म्हणेन विसरून माझं मौन
तिचा स्वर कातर आणि शब्द ओथंबलेले
’का रे छळ्तोस असा माझे श्वास थांबलेले’
दोघांमधलं अंतर आता वारयासारखं सरत असेल
आता तिथे एक माणूस माझ्यासाठी झुरत असेल.
-प्रसाद कुलकर्णी

Monday, May 4, 2009

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं
रचना - संत बहिणाबाई चौधरी
संगीत - वसंत पवार
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - मानिनी (१९६१)

Monday, April 6, 2009

एका तळ्यात होती


एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  
कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे 
सर्वाहूनी निराळे ते वेगळे तरंगे 
दावूनि बोट त्याला, म्हणती हसून लोक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणाशी ? 
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक 
आहे कुरुप वेडे, पिल्लू तयात एक  

एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले 
भय वेड पार त्याचे, वार्‍यासवे पळाले 
पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक 
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक


Friday, April 3, 2009

मन उधाण वाऱ्याचे


मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते,
हुरहूरत्या सांजेला कधी एकटेच झुरते..
सावरते बावरते घडते अडखळते का पडते,
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते…
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते..
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते………… …..

मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते…

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते,
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागून पळते..
मन उधाण वाऱ्याचे गूज पावसाचे..
का होते बेभान कसे गहिवरते………… 

Thursday, March 19, 2009

फोटोतली तरुणी

माज्या खोलीतल्या फोटोतली तरुणी
परवा माला म्हणाली
"मला चा़गलेसे स्थळ शोधून द्या ना..."
"इथे माजा जीव टा़़गल्या सारख वाटतय .."


- पु.ल.देशपांडे

प्रश्न


आताशा बुडणाऱ्या सुर्याला
"बरय उद्या भेटू "
अस म्हणालो की
मला म्हणतो ,
कशावरून
मधल्या रात्रीची
तुला अजूनही इतकी खात्री आहे? "

सूर्य आता म्हातारा झालाय.


- पु.ल.देशपांडे

Wednesday, March 18, 2009

कणा


'ओळखलत का सर मला'
--पावसात आला कोणीकपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी।
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:
'गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भींतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी-बायको मात्र वाचली--
भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमधे पाणी थोडे उरले--
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे.चिखलगाळ काढतो आहे.'-
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला--
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

Thursday, March 12, 2009

प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून
वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो..

पण एकेक पापुद्रा निघत जातो.. तसतसे त्या रेशमी नात्यातील पदर उलगडत जातात.. यात 'मी' पणाचेही बंधन कधीतरी गळून पडते.....

जवळपणात होतो दूर आता दुरून झालो जवळ
म्हणू नकोस जाणूनबुजून मीच माया केली पातळ

तशी आठवण येत नाही भेटीचीही काय जरूर ?
सूर वाहे ऊर भरुन घरांत देखील चांदणे टिपूर

इतके दिवस हसत रुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळते खोल खोल माझ्याच दॄष्टीत मिटली आहेस

गंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत

कधी कामात कधी गाण्यात फ़ुलताफ़ळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो

आता तारे पिकत चालले आकाश झाले निरभ्र निवळ
दुरुन जवळ झालो तसे क्षितिजदेखील आले जवळ...

बा.भ.बोरकर

Wednesday, March 11, 2009

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही

काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची कधी फ़ुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गल्बत रुपेरी
त्याचा कोश किनार्यास कधी लाभणार नाही

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

कुसुमाग्रज

Monday, March 2, 2009

शरदागम

आभाळ निळें नि ढग पांढरे हवेंत आलेला थोडा गारवा
कोवळी सकाळ मनमोकळी धरातळी रंग एक हिरवा

साचून राहिल्या गढूळ पाण्याची हळुहळुं झालीं निर्मळ जळें
काठावर उभ्या राहून बाभळी वाकून पाहती रूप सावळे

टवटवलेली सारींच शेतें; ज्वारीच्या कुसेत अधीर होत
टपोर गर्भ तान्ह्या कणसाचा पान-आडोशात जन्मास येत

काळजी करते काळी माती कशी अजून कपाशी नाही फुलली
चौकशी कराया पंख हलवीत निळे तास पक्षी उतरती खाली

शेवंतीला कुणी उगीच सांगे, इतक्यांत तुझी वेळ आली नाही
गवताचे सोने होण्याआधीच पिवळ्या फुलांची नको करूं घाई!

- अनिल
फ़िटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश !
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे
जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास..

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास..

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास... .

गीत : सुधीर मोघे.
चित्रपट : लक्ष्मीची पाऊले .
संगीत : श्रीधर फडके .
गायक : सुधीर फ़डके अणि आशा भ्रोसले .

(शेवटचे कड्वे द्वंद्वगीतात वगळले आहे... नंतर श्रीधर फडकेंनी 'फ़िटे अंधाराचे जाळे' या अल्बममध्ये हे स्वत: गायले आहे).

डोळ्यात कशाला पाणी

आकाशात फ़ुललेली
मातीतील एक कहाणी
जो प्रवास सुंदर होता
आधार मातीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आकाश माथ्यावरती
सुख आम्रासवे मोहरले
भोवताल सुगंधी झाले
शून्यामधली यात्रा
वा-यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यात कशाला पाणी..

- कुसुमाग्रज

Sunday, March 1, 2009

नास्तिक

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !


एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे
देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....
एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो..............
- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

अगदीच काही नसण्यापेक्षा

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो । । .
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन . . .
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन . . .
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .
माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -
" बरं झालं हे झाड आलं !
अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

माझ्या अंगाखांद्यांवर
आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील . . .
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील . . .
ती म्हणतील -
" बरं झालं हे झाड आलं . . .
नाहीतर सगळा रखरखाटच होता !
याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळ्सळ्वत कुजबुजीन -
" बरं झालं मी झाड झालो . . .
वेडा कवी होण्यापेक्षा

आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लगेलही . . .
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढळतील . . .
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल . . .
आणी . . .

माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता ते म्हणतील -
" बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा . . ."

माझ्यावरती ' कोणी मी '
जळून राख बनताना
धूर सोडत म्हणेन -
" बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मरण्यापेक्षा . . . . . . . . . . . . "
- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

Friday, February 27, 2009

हसलो म्हणजे

'हसलो' म्हणजे 'सुखात आहे' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे 'दुखले नव्हते' ऐसे नाही..
'हसलो' म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे
म्हणायचे ते म्हटलो सारे ऐसे नाही ! ...

'हसलो' म्हणजे फक्त स्वतःच्या फजितीवरती
निर्लज्जागत दिधली होती स्वत:स टाळी
'हसलो' कारण शक्यच नव्हते दुसरे काही
'डोळ्यामध्ये पाणी नव्हते' ऐसे नाही !

'हसलो' कारण तूच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही !
'हसलो' कारण तुला विसरणे जितके अवघड,
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही !

'हसलो' कारण दुसर्‍यांनाही बरे वाटते
'हसलो' कारण तुला सुद्धा ते खरे वाटते !
'हसलो' म्हणजे फक्त डकवली फुले कागदी
'आतुन आलो होतो डवरून ऐसे नाही..

'हसलो' कारण शास्त्राची मज ओळख होती
अश्रु जाळण्यामधे जाते अधिक शक्ति !
'हसलो' कारण हिशोबास या दमलो नाही
'हसलो' कारण रडण्यामध्ये रमलो नाही !

'हसलो' कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे !
'हसलो' कारण सत्याची मज भीती नाही
'हसलो' कारण फसण्याच धसका नाही . .

- नेणिवांची अक्षरे, संदीप खरे

Wednesday, February 25, 2009

धुंद होते शब्द सारे...

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना - 2
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या

सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे
कैसे गुंफू गीत हे धुंद होते शब्द..

मेघा दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा - 2
चांद राती भाव गुंतुनी बहरला निशीगंध हा
का कळेना काय झाले .. भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा विश्रांत हा शांत हा

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
सैSये ... रमुनिया सार्या जगात रिक्त भाव असे जरी
कैसे गुंफू गीत हे......

धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना
धुंद होते शब्द सारे...
वार्या संगे वाहता त्या फुला पाशी थांबल्या


गीत: कौस्तुभ सावरकर
चित्रपट : उत्तरायण
गायक : रविन्द्र साठे, रविन्द्र बिजूर, बेला
संगीत : अमरत्य राउत
.

Tuesday, February 24, 2009

इंदिरा संत हे नाव नुसतं आठवलं तरी एक अगदी शांत सोज्वळ कविवृत्ती साकार सामोरी येते. त्यांनी अगदी मोजकंच गद्य लिखाण केलं. पण ते गद्य हे ही एक काव्यच! त्यांच्या 'मृद्गंध' या लेख संग्रहातल्या 'अरसिक किती हा शेला ' या लेखातला उतारा : निसर्गाच असं शब्दचित्र क्वचितच कुणी चितारू शकेल. .
------------------------------­------------------------------­-----

वादळासकट गारांचा पहिला वळीव कोसळून जावा। मग त्याच्या दुसर्या दिवशी सृष्टीने जो नजराणा पुढे केलेला असतो तो बघत रहावा. दरवर्षी मी त्या दिवसाची वाट पाहात असते. त्या दिवसाचा सूर्य उगवतो तोच किती निराळा! सूर्य चांगला वर आलेला असतो. तरी तो लाल पिवळा असा, उगवत्या पूर्ण चंद्रासारखा आभाळात स्निग्धपणे तरंगत असतो. सभोवती लालसर धुक्याचे वलय असणारा आणिचांगले उजाडल्यावरही असा प्रसन्न रंगमूर्ती दिसणारा सूर्य त्याच दिवशी पहायला मिळतो.
दूर आकाशाला टेकलेला यळ्ळूर गडही जमिनीसरशी तिरपे पंख पसरून पाठमोर्या बसलेल्या राखी पक्ष्यासारखा दिसतो, आणि त्याच्या पायथ्याशी जी झाडांची लांबलचक पसरलेली गर्दी असते. तीत शुभ्र अशा सावरीच्या कापसासारखे धुके घनदाट भरुन असते. शुक्याचा तो शुभ्र लांबलचक पट्टा आणि त्यात माने-कपाळापर्यंत बुडुन गेलेली झाडे, पलीकडे मधूनच चमकणारा विजेच्या तारांचा जुडगा ... ध्यानी मनी नसताच नकळत एक ओवी ओठांवर येते.
"भरली चंद्रभागा,
झाडं बुडाली लहान थोर
सव्वालाखाचा पीतांबर,
जनी धुईते पायावर ..."
जनी दिसत नव्हती, पण चंद्रभागा दिसत होती, बुडालेली झाडेझुडे दिसत होती. आणि त्या बहुमोल पीतांबरावरील जर चमचमत होती. मग विटेवर उभे राहून जनीची निर्व्याज भक्ती बघणारा तो विठू, म्हणजे इथे काशात कोमलाहून कोमल होऊन ते नवल पाहत राहिलेला हा सूर्य तर नसेल?
पण या मनोहारी चित्रापेक्षाही, वातावरणातील झिरिमिरी धुक्याला किती बघावे असे मला झाले. माझ्या श्वासाला जाणवणारे आणि खिडकीपासून त्या चंद्रभागेपर्यंत जे धुके लहरत होते त्याची शोभा कशी वर्णन करणार? समोरच्या इमारती, माळावरून जाणारी माणसे, शेळ्या, शेतातील कुणी चालवत असलेली कुरी, शिवारातील झोपडे ... या सर्वांवर जाळीदार मोहिनी पसरणारे ते तरळ विरळ धुके हाच या दिवसाचा सृष्टीने पुढे केलेला नाजूक नजराणा होता. हे धुके कसले? झिरझिरित अशी अती तलम ओढणीच. आणि मनात आले, सकाळी सकाळी शेजघरातून बाहेर येऊन वावरणारी नववधू जशी पापण्या खाली वळवून, नणंदा-जावाच्या रोखलेल्या गमतीदार नजरा टाळते आणि ओठावरची लाली आणि डोळ्यांतील चमक दिसू नये म्हणून घुंघट पुढे ओढून घरभर लगबगीने फिरते ... तशी ही सृष्टी, अवगुंठनवती.
महावस्त्राचा एक पदत बोटांनी धरून उचलून घडी उलगडावी तसे आता होते. समोर हे जाळीदार मनोहारी दृश्य दिसत असताना, मनात निराळेच धुके दिसू लागते. आमच्या घुमटमाळावरील रस्त्यावर मी हिवाळाभर बघत असलेले. वाहत्या नदीत शुभ्र वस्त्र पसरावे आणि ते प्रवाहावरोबर पसरत असताना त्यावर वलयांच्या चुण्या उमटत याव्यात, तसे समोरुन, आजूबाजूंनी पायाशी रांगत लहरत लाटालाटांनी येणारे धुके. शेजारच्या शेतावरुन फेनिल लहरींसारखे वार्यावर झुलत येणारे धुके. ते दुरुन येऊन एकदा पायांवरुन जाईपर्यंत पाऊलच पुढे उचलता येत नाही. वाटते, थोडे मुठीत धरुन ठेवावे. पण मिळत नाही..


संग्रह: मृद्गंध
लेख: अरसिक किती हा शेला....
लेखिका: इंदिरा संत.

Friday, February 20, 2009

एकदा केंव्हा तरी

एकदा केंव्हा तरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण
काय काय गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा.

मग लक्षात येतं की,
आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात् खाल्लेली नाही.
जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही.
चटक्यांच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण
परिस्थितीने दिलेले चटके सोसतानाच पुरेवाट झालेली आहे.

कॅलिडोस्कोप पाह्यलेला नाही.
सर्कस मधला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही.
तसच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्म ही राह्यलेला नाही.
कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा”
स्वतः बरोबर कधी नेला ते आपल्याला कळलंच नाही.

आता त्या ट्रिप्स नाहीत.
दोन दोन मुलांच्या जोड्या करुन चालणं नाही.
विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत.
प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही….

त्या उडणाऱ्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले.
त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं.
म्हणूनच ती अजुनही उडू शकते.
आपण अजून जमिनीवरच आहोत॥


-मंगेश पाडगांवकर

Thursday, February 19, 2009

आज या मैफ़ीलीत

आज या मैफ़ीलीत
काय मजा आली..
त्या एकटया चंद्राला पाहुन
चांदणी गालात हसुनी म्हणाली…

आली आहे मी इथे
तो साज चंदेरी घालुनी
आता डोळे भरुनी
तु घे मला पाहुनी..

मग घेतली त्या वेड्या चंद्राने
नजर आपली रोखुनी..
पुटपुटला तो ओठातल्या ओठात
“नाही पाहीले असे अप्रतिम सौंदर्य अजुनी !”

घायाळ झाली ती
अन लाजली ते ऎकुनी..
पुसले तीने त्याला आवर्जुन
कुठे होतास तु माझी मैफ़ील सोडुनी…

मग केला आवाज तीने
त्या छुमछुम पैणजनाचा..
इकडे वाढला होता
ठोका चंद्राच्या काळजाचा..

केली तीने सुरु
उधळण त्या सप्तसुरांची..
जाहली प्रेमळ दशा
त्या चंद्रच्या हळव्या मनाची

थिरकत होते पाय तीचे
घुमत होते नाद स्वरांचे
मग मत्रंमुग्ध जाहले होते
कान त्या चंद्राचे..

आता पेटला होते सार आसमंत
झाल्या सज्ज नर्तिका स्वर्गाच्या
न्हाउनी रंगात प्रकाश्याच्या
उजळला होते रंग मैफ़ीलीचा.

सारे विलीन होत होते..
तारेहि दिशाहीन होत होते..
आता जणु त्या मैफ़िलीने
सारयांना भाव वश केले होते..

मग मैफिलिचा रंग
मावळतीकडे अचानक वळाला..
होतच असे सारयांच्या डॊळ्यातुनी
थेंब अश्रुंचा गालावरुनी ओघळला

कारण असे काय घडले होते
त्या भावुक मैफिलित.
चक्क चंद्रच हरवला होते
त्या चांदणीच्या कुशीत

म्हणुनच कदाचीत
आजही जातो चंद्र त्या मैफिलिला
कारण नजरेस येत नाही
तो अमावसेच्या रातीला

एवढे असुनही
पोर्णिमेच्या रातीला तो एकटा असतो
चांदण्याची मैफिल मात्र
कायमचाच तर खेळ असतो…॥

-अनामिक

नेणिवेची अक्षरे

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यानमधील रक्त
ओल्या आठावनिंचे काही क्षण हवे असतात
चाकोरिला उध्वस्ताचे घन हवे असतात....

तसे काही चेहेर्यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी हसनार्यांचे हसने वेगले दिसते!
ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा
हवी असते षडाजासारखी सलग, शांत व्यथा.........

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरान्मधाल्या श्रुति
प्रेम नाही, हवी असते मला चवथी मिति!

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वथाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखल पश्चाताप!

- संदीप खरे ( नेणिवेची अक्षरे).

Wednesday, February 18, 2009

कसे सरतिल सये

कसे सरतिल सये मझ्याविना दिस तुझे सरताना आणि सांग सलतिल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुजे उरे
ओठभर हसे हसे उरातून वेडे पिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा आळीमीळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावून हसशील ना
गुलाबाची फूल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

कोण तुझ्या सौदातून उभे असे सामसूम
चिडिचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलचं आणि पुन्हा छळेलचं
नभातुन गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आसवांचे ओले सण
रोज रोज निजभर भरतिल ना
गुलाबाची फूल दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ....

इथे दूर देशी माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी
झडे सर काचभर तडा
तूच तूच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा
पड़े माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल ना भरतिल ना ..

आता नाही बोलायचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देह्भर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झूले
जरा घन झरू देना वारा गुदमरुदेना
तेव्हा नभ धरा सारी भिजविल ना
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतिल न भरतिल ना ॥

-संदीप खरे.

Tuesday, February 17, 2009

ससा तो ससा

ससा तो ससा की कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे अपुली

चुरुचुरु बोले तो तुरुतुरु चाले
नि कासवाने अंग हलविले
ससा जाई पुढे नि झाडामागे दडे
ते कासवाने हळू पाहीयले
वाटेत थांबलेना कोणाशी बोललेना
चालले लुटुलुटु पाही ससा

हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे
हे पाहुनिया ससा हरखला
खाई गार चारा, घे फांदीचा निवारा
तो हळूहळू तेथे पेंगुळला
मिटले वेडे भोळे, गुंजेचे त्याचे डोळे
झाडच्या सावलीत झोपे ससा

झाली सांज वेळ तो गेला किती काळ
नि शहारली गवताची पाती
ससा झाला जागा तो उगा करी त्रागा
नि धाव घेई डोंगराच्या माथी
कासवा तेथे पाही ओशाळला मनी होई
"निजला तो संपला" सांगे ससा

वेडं मन

वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….

कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…

कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…

कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…

कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….

कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट

कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा

एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं

असं गं कसं मन माझं मलाच समजेना…
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना…

Monday, February 16, 2009

तु असशीलही कदाचीत नसशीलही

तु असशीलही कदाचीत नसशीलही ..
एक ओळ असावी मात्र, तुझ्यासोबत लिहिलेली
कधीतरी नकोसं झाल की
खोल कुशीत घेणारी..

तु असशीलही कदाचीत नसशीलही
एक श्वास असावा फक्त, तुझ्यासोबत घेतलेला
माझा बंद पडला तर
काळजामधुन वाहणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

एक स्पर्श असावा तुझा फक्त, हळुवार हातांचा
जगाने दिलेल्या जखमांवरुन
मलम होऊन फिरणारा..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

एक दाद असावी तुझी फक्त, माझ्या कवितेला दिलेली
शब्दच सुचणार नाहीत तेव्हां
नवी आशा देणारी..
तु असशीलही कदाचीत नसशीलही. . .

पण आतुन एक हाक मात्र कायम असेन तुझी
काळीज चिरुन टाकणारा विरह असेनच तुझा
आणि त्या घावानंतरही
तुझ्यासाठी वाहणारी वेदना असेन..
तितकीच जिवंत आणी ताजी.. तुझ्या स्पर्शासारखी
आणी मागे असेन मी, पण तेव्हा
तु असशीलही कदाचीत नसशीलही

- अनामिक

Thursday, February 12, 2009

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर
ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


************ ********* *********

तिचे बोलणे ऐकून तो जरा... अस्वस्थ झाला. त्याच्या चेहे-यावरचा तो भाव तिला काही निराळाच भासला. क्शणातच त्याचा राग गायब झाला होता. त्याच्या डोळ्यातच तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले... हसून त्याने तिला विचारले.....आता तुझी पाळी....

तो : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर....
आता तू सांग कशी जगशील??
हाताच्या रेषांमध्ये कोणाचे नाव शोधशील?
आरशात पाहून कोणाच्या विचाराने लाजशील?
खिडकीत लपून कोणाच्या येण्याची वाट बघशील?
कोणाला आपल्या गप्पांमध्ये गुंतवशील?

एकाकीपण जेव्हा खायला येईल,
निरभ्र आभाळ जेव्हा अचानक भरून येईल,
गड्गडाटाने जेव्हा सौदमिनी गरजेल....
तेव्हा सांग कोणाला बिलगशील??

गप्पांचा ओघ ओसरू लागताच..
तू नकळत काही बोलून जाताच...
सांग स्वत:ला कशी आवरशील?
जखमी मनाला कशी सावरशील?

चांदण्या रात्री अर्धचंद्र पाहताना
कोणाच्या आठवात गढशील?
सुखाच्या आठवानेही तू
टपोरे अश्रू पाघळशील...
एकटीच स्फ़ुंदत बसशील..
किती वेळ तरी....

मैत्रिणींना एका "मैत्रिणीची" गोष्ट सांगताना.......
तू हळवी होशील...रडशील.
आठवशील फक्त मला...
बाकी सारे विसरशील.

माझी जाणीव हवा तुला करून देईल,
माझा भास छाया तुला करून देईल,
पाहशील जेव्हा झोपाळा एकाकी झुलताना,
माझा आभास श्वास तुला करून देईल,

लक्श कुठेही लागणार नाही,
चंचल चित्त स्थिरावणार नाही
स्वत:चे अश्रू कसोशीने तू दडशील,
मनात मला लपवून "नोर्मल" जगशील,
तुझ्या मनाचा रिक्तपणा कोणालाही कळणार नाही,
तू असेच दिवस रेटत जाशील...
सांग काय करशील?

तिच्या गोंधळलेल्या चेहे-यावर कोरलेले उत्तर त्याला उमजले..........
आणि त्यांचे ते भांड्ण...... असेच विरून गेले!!!

-अनामिक

Monday, February 9, 2009

तू तेव्हा तशी. तू तेव्हा अशी

तू तेव्हा तशी...
तू तेव्हा अशी...


तू माझ्या आयुष्याची पहाट॥
तू माझ्या कॆफ़ाची मत्त लाट..

तू मागील जन्मांची आर्त साद..
तू मानसकुंजातील वेणू नाद..

तू माझ्या एकांताचा प्रकाश..
तू माझ्या गीतांचा बाहुपाश..

तू माझ्या दु:खाची चांदरात..
तू माझ्या स्वप्नांचा पारिजात..

तू अम्रुतभासांचा अंग राग..
तू विझल्या नयनांचा दीप राग..

तू माझ्या जगण्याची वाटचाल..
तू माझ्या रक्ताचा रंग लाल..

तू माझ्या असण्याचा अंश अंश..
तू माझ्या नसण्याचा मधुर दंश..

-सुरेश भट.

Friday, February 6, 2009

आल्या आल्या म्हणतेस

आल्या आल्या म्हणतेस
आता
पुन्हा कधी जाणार नाही

जाता जाता म्हणतेस
आता
पुन्हा कधी येणार नाही

येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं ?
वा-यावरती तरंगणारी
सारीच पिसं

नसतानाही भरपूर असतेस
एवढं तुला कळणार नाही॥


-कुसुमाग्रज

Wednesday, February 4, 2009

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी
आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे..
ओथंबल्या क्षणांचे
हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी..
रंगली फ़ुगडी बाई रानात रानात
वाजती पॆंजण बाई तालात तालात
फ़ांदीवरला झोका उंच उंच गं झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी..
पावसातले दिवस अपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऎकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी
अजूनीच त्या ठिकाणी ती श्रावणओली गाणी
माझी तुझी कहाणी..

गीत: अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : सुरेश वाडकर
अल्बम : तेजोमय नादब्रम्ह

ऋतू हिरवा

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण,
प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन,
भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू,
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा

गीत : शांता शेळके
संगीत : श्रीधर फ़डके
गायिका : आशा भोसले
अल्बम : ऋतू हिरवा

Monday, February 2, 2009

चाफ्याच्या झाडा..

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....
चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

- पद्मा गोळे.

Saturday, January 31, 2009

आनंदयात्री

अफाट आकाश
हिरवी धरती
पुनवेची रात
सागर-भरती
पाचूंची लकेर
कुरणाच्या ओठी
प्रकाशाचा गर्भ
जलवंती-पोटी
अखंड नूतन मला ही धरित्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

मेघांच्या उत्सवीं
जाहलों उन्मन
दवांत तीर्थांचे
घेतलें दर्शन
दूर क्षितिजाची
निळी भुलावण
पाशांविण मला
ठेवी खिळवून
अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री
आनंदयात्री मी आनंदयात्री

हलके कढून
कंटक पायींचे
स्वरांत विणिले
सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा
केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें
पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.

-मंगेश पाडगांवकर

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले

टप्‌ टप्‌ पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर्‌ भिर्‌ भिर्‌ भिर्‌ त्या तालावर गाणे अमुचे जुळे !

कुरणावरती, झाडांखाली
ऊन-सावली विणते जाळी
येतो वारा पाहा भरारा, गवत खुशीने डुले !

दूर दूर हे सूर वाहती
उन्हात पिवळ्या पाहा नाहती
हसते धरती, फांदीवरती हा झोपाळा झुले !

गाणे अमुचे झुळ-झुळ वारा
गाणे अमुचे लुक-लुक तारा
पाऊस, वारा, मोरपिसारा या गाण्यातुन फुले !

फुलांसारखे सर्व फुला रे
सुरात मिसळुनि सूर, चला रे
गाणे गाती तेच शहाणे बाकी सारे खुळे !

- मंगेश पाडगांवकर

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

पुस्तक नंतर वाचा, आता खेळा नाचा

मी बाई फुलराणी, गाईन सुंदर गाणी
फुले भरा भरा वेचा, आता खेळा नाचा

फूलपाखरू आले, मला हळूच म्हणाले
“तू राजा रानाचा !”, आता खेळा नाचा

कानी सुंदर डूल, तसे डुलते फूल
झुले झुला पानाचा, आता खेळा नाचा

थेंब दवाचे करती, चमचम गवतावरती
नजराणा किरणांचा, आता खेळ नाचा

- मंगेश पाडगांवकर

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?

-

जिप्सी

एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून

आठवतें बालपण जेव्हां होतों मी खेळत
होतों बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौलें पानांचीं घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवतें अजूनहि होतों रंगत मी किती !
पण अकस्मात होतों जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

शाळेंतले ते दिवस पाटी-पुस्तक हातांत
टोपी जरीची सुंदर … स्वारी निघाली थाटांत
जाड काचेची चाळिशी लावूनिया डोळ्यांवर
होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतींच्या जगांत
उडे खिडकीमधून दूरदूरच्या ढगांत
झाडें पानांच्या हातांनीं होतीं मला बोलवीत
शेपटीच्या झुबक्यानें खार होती खुणवीत
कसें अवरावें मन ? गेलॊं पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

आणि पुढें कशासाठीं गेलॊ घर मी सोडून !
सारीं सारीं सुखे होतीं, काही नव्हतेंच न्य़ून
पण खोल खोल मनीं कूणी तरी होतें द:खी
अशा सुखांत असून जिप्सी उरला असुखी
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्या लाटा …
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

कधीं कधीं पहाटते उरीं आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपतें चित्तीं
जाचूं लागते जिप्सीला द्न्यात विश्वाची चौकट
आणि जाणवतें काहीं गूढ … अंधुक … पुसट !
खेळ सांडिलेला सारा पुन्हा उधळाया सजे
आपणच निर्मिलेलें आपणच मोडूं धजे
गुढ अद्न्यात धुक्यांत आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

घर असूनहि आतां घर उरलेलें नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावें ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

(जिप्सी) -मंगेश पाडगांवकर


कळणे

मी तुला कविता दिली वाचायला
आणि तुला विचारलं , “कशी वाटली?”
तु, म्हणालीस, ’यातलं मला काहीसुध्दा कळलं नाही”

चकित होऊन मी तुला म्हणालो,
“काही सुध्दा कळलं नाही? मग आता असं कर,
खिडकीतुन या समोरच्या झाडाकडे पहा;
झाडाला फुलांनी घट्ट मिठी घातली आहे”

तु म्हणालिस, “पाहिलं. मग आता”
मी म्हणालॊ, “फुलांनी मीठी घातलेलं झाडं तुला कळलं,
मग आता माझ्या ह्या कवितेत
कळलं नाही असं काहिच उरलं नाही.”

(आनंद ऋतु ) -मंगेश पाडगांवकर.

सलाम

सलाम
सबको सलाम
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणार्‍याला सलाम,
न बघणार्‍याला सलाम,
विकत घेणार्‍याला सलाम,
विकत घेणाचा इषारा करणार्‍याला सलाम,
सलाम,भाई,सबको सलाम.

वटारलेल्या प्रतेक डोळ्याला सलाम,
शेंदूर फासलेल्या दगडाला सलाम,
लाखो खर्चून बांधलेल्या देवळांना सलाम,
देवळातल्या देवांच्या धाकाला सलाम,
देवांचे आणि धर्माचे कंत्राट घेणार्यांना सलाम,
रिकाम्या हातातून ऊद कढणार्‍या बडेबुवाला सलाम,
शनीला सलाम,
मंगळाला सलाम,
भितीच्या प्रतेक ठेकेदाराला सलाम,
आईवर आयुष्यभर गुरगुरणार्‍या बापाला सलाम,
बापावर गुरगुरणार्‍या साहेबाला सलाम,
साहेबाची टरकवणार्‍या
त्याच्या सहेबाला सलाम,
सलाम,प्यारे भाईयों और भैंनो,
सबको सलाम.

ज्याच्या हातात वृत्तपत्र
त्याला सलाम,
भाषणांचे,सभांचे
फोटो सकट रिपोर्ट छापतो त्याला सलाम,
वृत्तपत्रांच्या मालकांना सलाम,
त्यांची वेसण धरणार्‍या
राज्यकर्त्यांना सलाम,
ज्याच्या समोर माइक्रोफोन
त्याला सलाम,
त्यातून न थांबता बोलतो
त्याला सलाम,
लाखोंच्या गर्दीला सलाम,
गर्दी झुलवणार्‍या
जादुगारांना सलाम,
भाईयों और भैनों सबको सलाम.

नाक्यावरच्या दादाला सलाम,
हातभट्टीवाल्याला सलाम,
स्मग्लरला सलाम,
मट्‍केवाल्याला सलाम,
त्यांनी पेरलेल्या हफ्त्यांना सलाम,
लोकशाहीलाबी सलाम,
ठोकरशाहीलाबी सलाम,
सत्तेचा ट्रक चालाविण्यार्‍यांना सलाम,
ट्र्क खाली चिरडलेल्या,
गांडुळांना,कुत्र्यांना सलाम,
ज्याच्या हातात चाकू त्याला सलाम,
विमानातून बँम्ब फेकणर्‍यालंना सलाम,
शस्त्रास्त्रांच्या प्रचंड व्यापार्‍यांना सलाम,
कळाबाजारवल्यांना सलाम,
त्यांना फाशी देण्याची घोषणा करणार्‍यांना सलाम,
गटारातल्या पाण्याने इंजेक्शन भरणार्‍यांना सलाम,
तिरडीचे समान विकणार्‍यांना सलाम,
तिरडी उचलणार्‍या खांद्यांना सलाम,
मौत सस्ती करणार्‍या सर्वांना सलाम,
सलाम,प्यारे दोस्तों,सबको सलाम.

बिळांना सलाम,
बिळातल्या उंदरांना सलाम,
घरातल्या झुरळांना सलाम,
खाटेतल्या ढेकणांना सलाम,
पिचलेल्या बयकोला सलाम,
दीड खोलीतल्या पोरडयाला सलाम,
गाडीत चेंगरणार्‍या गर्दीला सलाम,
किडक्या धान्याला सलाम,
भोके पडलेल्या पिवळ्या गन्जिफ्रोकला सलाम,
धध्यांच्या मलकाला सलाम,
युनीयनच्या लिडरला सलाम,
संपाला सलाम,
उपासमारीला सलाम,
सर्व रंगांच्या सर्व झेंड्यांना सलाम,

चाळीचाळीतून तुंबलेल्या
संडासातल्या लेंड्यांना सलाम,
मानगूट पकडणार्‍या
प्रतेक हाताला सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

या मझ्या परमपवित्र इत्यादी देशाला सलाम,
या देशाच्या सुउदात्त सुमंगल सुपरंपरेला सलाम,
सर्व बिलंदर घोशणांना सलाम,
जातिभेदाच्या उकिरड्यांना सलाम,
या उकिरड्यातून सत्तेच पीक कढणार्‍यांना सलाम,
उपनिषदे आणि वेदांना सलाम,
साखरकारखान्यांच्या दादांना सलाम,
त्यांच्या शेकडो लोर्‍यांना सलाम,
निवडणुकींना सलाम,
निवडणुकफंडाला सलाम,
अद्रूष्य बुक्यांना सलाम,
मतांच्या आंधळ्या शिक्यांना सलाम,
ससा हाती असलेल्या पारध्यांना सलाम,
त्यांच्या तैनतीतल्या गारद्यांना सलाम,
दलितांवर अत्याचार करणार्‍यांना सलाम,
या बातम्या वचाणार्‍या सर्व षंढांना सलाम,
सलाम,भाइयों और भैनों,सबको सलाम.

सत्ता संपत्तीच्या भाडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्ह्टले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदलेजाणार्‍यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाइट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्‍यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील ः
म्हणून आधी मझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या मझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.

सलाम प्यारे भाइयों और भैनों,सबको सलाम,
अनेक हात असते
तर अनेक हातांनी केला असता सलाम,
लेकिंन माफ करना भाइयों,
हात तर दोनच
आणि त्यातला डावा
लाथेच्या भयाने
ठेवलेला गांडीवर
म्हणून फक्त ऊजव्या हाताने सलाम,
सलाम,सबको सलाम,
भाइयों और भैनों,सबको सलाम.

मंगेश पाडगांवकर

श्रावणात घन निळा बरसला

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा

जागुनि ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी
निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदिचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुलपाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा

- मंगेश पाडगांवकर

लाजून हासणे अन्‌

लाजून हासणे अन्‌ हासून हे पहाणे
मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा ?
मिटताच पापण्या अन्‌ का चंद्रही दिसावा ?
हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे ?
हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे !
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे

जाता समोरुनी तू उगवे टपोर तारा
देशातुनी फुलांच्या आणी सुगंध वारा
रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे

-मंगेश पाडगांवकर

आयुष्यावर बोलू काही

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ,
भिडले नाहीत डोळे तोवर बोलू काही !

तुफान पाहून तीरावर कुजबुजल्या होड्या ,
पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही !

हवेहवेसे दुःख तुला जर हवेच आहे ,
नकोनकोसे हळवे कातर बोलू काही !

उद्याउद्याची किती काळजी बघ रांगेतुन ;
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही !

शब्द असु दे हातामध्ये काठी म्हणुनी ;
वाट आंधळी प्रवास खडतर बोलू काही !

जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही;
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही !

-संदीप खरे

बोलायाचे कितीक आहे ...

माझ्यापाशी सुरेख वारा आणि भोवती अक्षरधारा,
बोलायाचे कितीक आहे पण ओठातुन झिरपत नाही.

फुरफुरणारे बाहू माझे प्रचंड शक्ती आणि उसासे,
तोडायाचे बंधन जे जे आवेशातुन उतरत नाही.

थरथरणा-‍या स्वरात माझ्या कंपुन उठतिल भाव - भावना,
स्वच्छंदी गाण्यात परंतू तान मोकळी येतच नाही.

दहा दिशांच्या रिंगणातुनी क्षितीजसुद्धा उल्लंघिन मी,
एकवटाया सारे बळ परि मनगट ते सरसावत नाही.

रंग उषेचे हातामधुनी उधळीत जाईन पानोपानी,
घेतो मी कुंचला तसा अन् विचार तेव्हा रंगत नाही.

मी वेडा आनंदासाठी धुंद मोकळ्या श्वासासाठी,
मन्मनात जे आता आहे अंतरातुनी बरसत नाही.

उगाच फिरतो पृथ्वीवरती शोधित जातो उजाड नाती,
मी माझ्याशी ठेऊन नाते माझ्याशीही बोलत नाही.


पुरुषोत्तम करंडकासाठी CoEP ने सादर केलेल्या "होते कुरूप वेडे" या एकांकिकेमधुन...

वेळच नसतो....

मनाप्रमाणे जगण्यासाठी वेळच नसतो
मला, स्वप्नही बघण्यासाठी वेळच नसतो...

वसंत येतो, श्रावण येतो अनेकदा; पण
फुलण्यासाठी, भिजण्यासाठी वेळच नसतो...

ओळख असलेलेच भेटती लोक मला, पण
बघून 'त्यांना' हसण्यासाठी वेळच नसतो...

प्रेम कुणीही का माझ्यावर करीत नाही?
प्रेम कुणा का करण्यासाठी वेळच नसतो?

नशिबी असते जे-जे, घडते ते-ते तेव्हा
नशिबी माझ्या 'घडण्यासाठी' वेळच नसतो...

'अजब' चालली कशाला पुढे इतकी दुनिया?
कुणास मागे वळण्यासाठी वेळच नसतो...

कवी - अजब.

पितात सारे गोड हिवाळा


न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा


- बा. सी. मर्ढेकर

अखेर कमाई


मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

- कुसुमाग्रज

को-या को-या कागदावर

को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

ती मनात झुरते आहे
तुम्ही पहात राहणार
कल्पनेच्या पावसात
नुसतं नहात राहणार
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
घट्ट जवळ घेतल्याशिवाय
माणुस नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

शब्द शब्द रीते शब्द
त्यांचं काय करणार?
तळ फुटक्या माठामधे
पाणी कसं भरणार?
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आपण ओठ लावल्याखेरीज
पाणी नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

करुन करुन हिशेब धुर्त
खुप काही मिळेल
पण फुल का फुलतं
हे कसं कळेल
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
फुलपाखरु बनल्याखेरीज
फुल नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं

मातीमधे बीजाला
एकचं अर्थ कळतो
कोंब फुटुन आल्यावर
हीरवा मोक्ष मीळतो
मला सांगा व्हायचं कसं?
मुक्कामाला जायचं कसं?
आतुन आतुन भीजल्याखेरीज
रुजणं नसतं आपलं
को-या को-या कागदावर
असलं जरी छापलं
ओठांवर आल्याखेरीज
गाणं नसतं आपलं


- मंगेश पाडगावकर

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

- कुसुमाग्रज

पारवा

भिंत खचली कलथून खांब गेला
जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाला
तिच्या कौलारी बसुनी पारवा तो
खिन्न नीरस एकांतगीत गातो

सूर्य मध्यान्ही उभा राहे
घार मंडळ त्याभवती घालताहे
पक्षी पानांच्या शांत सावल्यांत
सुखे साखरझोपेत पेंगतात.

तुला नाही परि हौस उडायाची
गोड हिरव्या झुबक्यात दडायाची
उष्ण झळ्या बाहेर तापतात
गीतनिद्रा तव आंत अखंडित

चित्त किंवा तव कोवळ्या विखारे
दुखतेखुपते का सांग सांग बा रे
तुला काही जगतात नको मान
गोड गावे मग भान हे कुठून

झोप सौख्यानंदात मानवाची
पुरी क्षणही कोठून टिकायाची
दुःखनिद्रे निद्रिस्त बुध्दराज
करूणगीते घुमवीत जगी आज.

दुःखनिद्रा ती आज तुला लागे
तुझे जगही निद्रिस्त तुझ्या संगे
फिरे माझ्या जगतात उष्ण वारे
तुला त्याचे भानही नसे बा रे.


- बालकवी

आला आषाढ-श्रावण


आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


बा. सी. मर्ढेकर

देणा-याने देत जावे

देणा-याने देत जावे;
घेणा-याने घेत जावे.

हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.

वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे.

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणा-याने देत जावे;
घेणा-याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणा-याचे हात घ्यावेत.


- विं दा करंदीकर

श्रावणमासी


श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी

माणूस माझे नाव

माणूस माझे नाव, माणूस माझे नाव
दहा दिशांच्या रिंगणात या पुढे माझी धाव...

बिंदु मात्र मी क्षुद्र खरोखर
परी जिंकले सातही सागर
उंच गाठला गौरीशंकर
अग्नीयान मम घेत चालले आकाशाचा ठाव...

मीच इथे ओसाडावरती
नांगर धरुनी दुबळ्या हाती
कणकण ही जागवली माती
दुर्भिक्ष्याच्या छाताडावर हसत घातला घाव...

ही शेते अन् ही सुखसदने
घुमते यातून माझे गाणे
रोज आळवित नवे तराणे
मी दैन्याच्या विरुद्ध करतो क्षण क्षण नवा उठाव...

सुखेच माझी मला बोचती
साहसास मम सीमा नसती
नवीन क्षितिजे सदा खुणवती
दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव...


- बाबा आमटे

जयोऽस्तुते

जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती, त्वामहं यशोयुताम् वंदे ॥धृ॥

राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीति संपदांची
स्वतंत्रते भगवती, श्रीमती राज्ञी ती त्यांची
परवशतेच्या नभात तुची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखती

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं
स्वतंत्रते भगवती, तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभिर्यही तूची
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेची

मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती, सर्व तव सहचारी होते

हे अधम रक्तरंजिते, सुजनपुजिते, श्री स्वतंत्रते
तुजसाठी मरण ते जनन
तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण
भरतभूमिला दृढालिंगना कधी देशील वरदे

हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तिथे करण्याचा का तुला वीट आला
होय आरसा अप्सरसांना सरसें करण्याला
सुधाधवल जान्हवीस्रोत तो का गे त्वां त्याजिला
स्वतंत्रते, या सुवर्णभूमित कमती काय तुला
कोहिनुर चे पुष्प रोज घे ताजे वेणीला

ही सकल श्री संयुता, अमुची माता, भारती असता
का तुवा ढकलुनी दिधली
पूर्वीची ममता सरली
परक्याची दासी झाली
जीव तळमळे, का तू त्याजिले उत्तर याचे दे
स्वतंत्रते भगवती, त्वामहं यशोयुतां वंदे

- विनायक दामोदर सावरकर

सागरा प्राण तळमळला

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता
मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू
तइं जननीहृद् विराहशंकीताही झाले, परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला
सागरा, प्राण तळमळला ...

शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी
भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे
तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला ...

नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा
प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा
भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे
तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला ...

या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनी का आंग्ल भूमी ते
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासना ते देती
तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे
कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला ...


- विनायक दामोदर सावरकर

या बाळांनो, या रे या

या बाळांनो, या रे या
लवकर भरभर सारे या

मजा करा रे मजा करा
आज दिवस तुमचा समजा
स्वस्थ बसे तोचि फसे;
नवभूमी दाविन मी,
या नगराला लागुनिया
सुंदर ती दुसरी दुनिया

खळखळ मंजुळ गाती झरे,
गीत मधुर चहुबाजु भरे
जिकडे तिकडे फुले फळे,
सुवास पसरे, रसही गळे.
पर ज्यांचे सोन्याचे
ते रावे, हेरावे.
तर मग कामे टाकुनिया
नवी बघा या ही दुनिया


- भा. रा. तांबे

नदी

नदीबाई माय माझी डोंगरात घर
लेकरांच्या मायेपोटी येते भूमीवर

नदीबाई आई माझी निळे निळे पाणी
मंद लहरीत गाते ममतेची गाणी

नदीमाय जळ सा-‍या तान्हेल्यांना देई
कोणी असो कसा असो भेदभाव नाही

शेतमळे मायेमुळे येती बहरास
थाळीमध्ये माझ्या भाजी-भाकरीचा घास

श्रावणात आषाढात येतो तिला पूर
पुढच्यांच्या भल्यासाठी जाई दूर दूर

माय सांगे, थांबू नका पुढे पुढे चला
थांबत्याला पराजय चालत्याला जय

- कुसुमाग्रज

पाऊस


त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.


कवी - सौमित्र

आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा

“आणायचा, माझ्या ताईला नवरा आणायचा !”
“नको बाई नको, मला नवरा नको.”

“त्याचं खप्पडच नाक, त्याच्या पाठीला बाक,
दोन्ही डोळ्यांनी चकणा शोधायचा !
माझ्या ताईला नवरा आणायचा !”

“माझ्या दादाला बायको आणायची !”
“नको बाबा नको, मला बायको नको.”

“लाटणं तिच्या हाती, लागे तुझ्या पाठी
भोपळा टुणुक टुणुक तशी चालायची.
माझ्या दादाला बायको आणायची !”

“माझ्या ताईला नवरा आणायचा !
घट राहील अशा, मोठ्या दाढी-मिशा
बायको उडून जाईल असा घोरायचा.
माझ्या ताईला नवरा आणायचा !”

“माझ्या दादाला बायको आणायची !
तिचा घसा कसा ? गाढव गाई तसा.
लाडे लाडे तुझ्याशी बोलायची.
माझ्या दादाला बायको आणायची !”

- मंगेश पाडगांवकर.

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ?
या ओळी चिल्लर वटतात
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?

असल्या तर असू दे,
फसल्या तर फसू दे !

तरीसुद्धा
तरीसुद्धा,

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून
प्रेम करत येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून
प्रेम करता येत;
व्याकरणात चूकलात तरी
प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात ती
प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की
अंगात फुलं फुलू लगतात
जागेपणी स्वप्नांचे
झोपाळे झुलू लगतात !

आठवतं ना ?
तुमची आमची सोळा जेव्हा,
सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !

लाटांवर बेभान होऊन
नाचलो होतो,
होडी सकट बूडता बूडता
वाचलो होतो !

बुडलो असतो तारीसुद्धा चाललं असतं :
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !

तुम्हाला ते कळलं होतं,
मलासुद्धा कळलं होतं !

कारण
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं

म्हणणारी मणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं
मानणारी माणस भेटतात !
असाच एकजण चक्क मला म्हणाला :
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही !
पाच मुलं झाली तरी प्रेमबिम कधीसुध्दा केलं नाही !
आमचं काही नडलं का ? प्रेमाशिवाय अडलं का ? “
त्याला वाटलं मला पटलं;
तेव्हा मी इतकचं म्हटलं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं अगदी ‘सेम’ नसतं !

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्ध-अर्ध खाल्लं असेल गोडीने
भर दुपारी उन्हात कधी तिच्या सोबत तासनतास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल.
प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतं सुध्द, निळं चांदणं सांडतं सुध्दा,
दोन ओळींची चिठ्ठीसुध्दा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुध्द प्रेम असतं.

बोलगाणी - मंगेश पाडगांवकर

सांगा कस जगायचं?

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

-मंगेश पाडगावकर.

यांचं असं का होतं कळत नाही

यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

निळं निळं वेल्हाळ पाखरु
आभाळात उडणार;
रुपेरी वेलांटी घेत
मासा पाण्यात बुडणार!

याचं सुख नसतंच मुळी
कधी यांच्या साठी!
एकच गोष्ट यांची असते;
कपाळावर आठी!!

कधी सुध्दा यांची पापणी ढळत नाही!
यांचं असं का होतं कळतं नाही,
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

मोठ्यानं हसा तुम्ही;
यांना नैतिक त्रास होतो!
वेलची खाल्लीत तरी ह्यांना
व्हीस्की चा वास येतो!!

यांचा घॊशा सुरु असतो:
अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं,
त्मकं मुळिच पिऊ नका,
त्याने पडसं होतं!!

संयमाचे पुतळेच हे!
यांचं नम चुकुनही चळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

सगळेच कसे बागेमधे
व्यायाम करत असणार?
किंवाअ हातात गिता घेउन
चिंतन करित बसणार?

बागेतल्या कोपऱुयात किणी
घट्ट बिलगुन बसतंच नां?
गालाला गाल लाउन
गुलु गुलु करित असतंच ना?

असं काही दिसलं की
यांचं डॊकं सणकलंच!
यांच्या अध्यात्माचं गळू
अवघड जागी ठणकलंच!!
नैतिक सामर्थ्याचं यांच्या
वेगवान घोडं असतं:
पण यांना मुलं होतात
हे एक कोडंच असतं!!

या कठीण कोड्य़ाचं उत्तर मात्र मिळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

कसल्याही आनंदाला
हे सतत भित असत्त:
एअरंडॆल प्यावं तसं
आयुष्य पीत असतात!

एरंडॆल प्याल्यावर
आणखी वेगळं काय होणार?
एकच क्षेत्र ठरलेलं !
दुसरीकडे कुठे जाणार?

कारण आणि परिणाम
यांचं नातं टळत नाही!
यांचं असं का होतं कळत नाही
किंवा त्यांना कळतं पण वळत नाही?

-मंगेश पाडगांवकर.

नको नको रे पावसा


नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली ॥

नको नाचू तडातडा असा कौलारावरून
तांबे, सतेली, पातेली आणू भांडी मी कुठून ॥

नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण
नको टाकू फूलमाळ अशी मातीत लोटून ॥

आडदांडा नको येऊ झेपावत दारातून
माझं नेसूचं जुनेरं नको टाकू भिजवून ॥

किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐक ना
वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आण ना ॥

वेशीपुढे आठ कोस जा रे आडवा धावत
विजेबाई कडाडून मागे फिरव पांतस्थ ॥

आणि पावसा, राजसा, नीट आण सांभाळून
घाल कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन ॥

पितळ्याची लोटीवाटी तुझ्यासाठी मी मांडीन
माझ्या सख्याच्या डोळ्यांत तुझ्या विजेला पूजीन ॥


- इंदिरा संत

मी तिला विचारलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घडलं ?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं……..

तुमचं लग्न ठरवून झालं ?
कोवळेपण हरवून झालं ?
देणार काय ? घेणार काय ?
हुंडा किती ,बिंडा किती ?
याचा मान , त्याचा पान
सगळा मामला रोख होता ,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगून तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं…

ते सगळं जाऊ द्या, मला माझं गाणं गाऊ द्या..
मी तिला विचारलं ,
तिनं लाजून होय म्हटलं ,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली ,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

मग एक दिवस,

चंद्र, सूर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणार्‍या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधीच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरीसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे

मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येऊन बसलं

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटलं
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……

पुढे मग तिच्याशीच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली…

तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?

मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं

(बोलगाणी )-मंगेश पाडगांवकर

पैठणी

फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली

त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी

माझी आजी लग्नामध्ये
हीच पैठणी नेसली होती
पडली होती सा-यांच्या पाया
हाच पदर धरून हाती

पैठणीच्या अवतीभवती
दरवळणारा सुक्ष्म वास
ओळखीची... अनोळखीची...
जाणीव गुढ़ आहे त्यास

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन... एक मन...

खसहिन्यात माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला

पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन

मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा..


- शांता शेळके